मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सागर मंडळाची कामकाज आढावा बैठक!

मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली आहे. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, मुख्य अभियंता राजाराम गोसावी, वित्त नियंत्रक व मुख्य लेखाधिकारी सारंगकर, उपजिल्हाधिकारी अंजली भोसले, महाव्यवस्थापक रोहित पुरी, उपसंचालक (आशियाई विकास बँक) डॉ.महेश चंदूरकर उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्राला व मुबंईला भव्य व निसर्गसंपन्न समुद्रकिनारा लाभलेला आहे. या जागेचा व्यावसायिक उपयोग करून शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. या जागांच्या योग्य नियोजनातून महाराष्ट्र सागरी मंडळाला महसूल उपलब्ध होईल. अशा दृष्टीने नियोजन करावे, असेही श्री. राणे यांनी सांगितले. कोची मेट्रो यांच्यावतीने केरळमध्ये बॅक वॉटरचा वापर करून मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर मुंबई व ठाणे या परिसरातील नद्यांच्या पाण्यात वॉटर मेट्रोसेवा सुरू केल्यास वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. असा प्रस्ताव कोची मेट्रोच्या प्रतिनिधींनी मांडला. क्रिसील संस्थेच्या वतीने राज्यात नौका निर्मिती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. अशा प्रकल्पांद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत संस्थेच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केले.