‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ उपक्रमांतर्गत संत निरंकारी फाउंडेशनतर्फे बहुळा धरण परिसराची स्वच्छता!

पाचोरा: (मधुर खान्देश वृत्तसेवा) संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवस निमित्ताने ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या देशव्यापी अभियानांतर्गत पाचोरा जवळील बहुळा धरण परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. निरंकारी मंडळाच्या प्रमुख सतगुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. नदी, धरणे आणि पाण्याचे स्रोत प्रदूषणमुक्त राहावेत या उद्देशाने आयोजित या मोहिमेत पाचोरा आणि राणीचे बांबरुड ब्रांचमधील सुमारे २०० ते २५० सेवा दल सदस्य, महात्मा आणि भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी लवकर सुरू झालेल्या या मोहिमेत स्वयंसेवकांनी धरण परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर चकाचक केला. या सेवा कार्यासाठी पाचोरा ब्रांच प्रमुख महेश शिवाजी वाघ आणि राणीचे बांबरुड येथील मुखी सत्यविजय काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ‘केवळ परिसर स्वच्छ करून चालणार नाही, तर आपले मनही स्वच्छ आणि निर्मळ हवे’ हा सतगुरुंचा संदेश या मोहिमेद्वारे जनमानसात पोहोचवण्यात आला.
पाचोरा आणि राणीचे बांबरुड येथील सर्व संत महात्म्यांनी अथक परिश्रम घेऊन बहुळा धरण परिसर स्वच्छ केला. या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत असून, जलसंधारण आणि स्वच्छतेबाबत समाजात नवी जाणीव निर्माण झाली आहे.












