दुर्दैवी घटना: निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या CRPF जवानाचा अपघाती मृत्यू; पाचोरा तालुक्यावर शोककळा

पाचोरा:देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या एका रक्षक पुत्रावर काळाने घाला घातला आहे. पाचोरा येथील रहिवासी असलेले प्रदीप राजाराम पाटील राहणार – विद्या नगर राजीव गांधी कॉलनी पाचोरा सध्या सीआरपीएफ (CRPF) मध्ये कार्यरत असलेले जवान, जे अवघ्या काही दिवसांनी सेवानिवृत्त होणार होते, त्यांचा रजेवर असताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पाचोरा परिसरात आणि विद्या नगरी भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित जवान हे आपल्या ८ दिवसांच्या रजेसाठी घरी आले होते. १६ फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या कुटुंबासोबत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. याच काळात ३१ मार्च रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रमही नियोजित होता. निवृत्तीनंतरचे आयुष्य कुटुंबासोबत घालवण्याचे स्वप्न पाहत असतानाच १९ फेब्रुवारीच्या रात्री घात झाला. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा उत्साह साजरा करून घरी परतत असताना त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, मात्र दुर्दैवाने २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९:५४ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. एका कर्तव्यदक्ष जवानाच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा अंत्यविधीची दिनाक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता. ठिकाण: विद्या नगरी, राजीव गांधी कॉलनी येथून अंत्ययात्रा निघून पाचोरा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
“देशासाठी रक्त सांडणाऱ्या वीराचा असा अंत मनाला चटका लावून जाणारा आहे. संपूर्ण पाचोरावासीय या दुःखद प्रसंगी परिवाराच्या पाठीशी उभे असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिक सागर पाटील यांनी दिली आहे.”





