वरखेडी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ संपन्न

प्रशासकीय सेवा पोहचल्या नागरिकांच्या दारी; हजारो ग्रामस्थांनी घेतला लाभ
पाचोरा (प्रतिनिधी): ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेला मूर्त रूप देत, पाचोरा तालुक्यातील वरखेडी बु.येथे दि. १४ मार्च २०२६ रोजी चौधरी मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून महसूल, कृषी, आरोग्य आणि इतर विविध विभागांनी एकाच छताखाली नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी तहसीलदार विजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात प्रजेच्या अडचणी त्वरित सोडवण्याची जी परंपरा निर्माण केली होती, त्याच विचारातून शासनाने हा अभिनव उपक्रम राबविला आहे.” तहसीलदार श्री. विजय बनसोडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत प्रशासकीय यंत्रणा सामान्य माणसासाठी कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. या शिबिरात वरखेडी मंडळातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. शिबिरादरम्यान खालीलप्रमाणे लाभ आणि सेवांचे वितरण करण्यात आले:
- महसूल विभाग: वारस नोंदी, ७/१२ दुरुस्ती, उत्पन्न दाखले.
- कृषी विभाग: शेती उपयोगी अवजारांचे वाटप.
- पुरवठा विभाग: ई-शिधापत्रिका (E-Ration Card) वितरण.
- एस.टी. महामंडळ: NCMC कार्डची नोंदणी.
- समाज कल्याण: संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी व घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण. या शिबिरात सर्व विभागांच्या माध्यमातून एकूण १२.३५ लाख रुपयांचे विविध लाभ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित करण्यात आले. या शिबिरासाठी तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन मंडळ अधिकारी सुनील पवार यांनी केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून दीपकभाऊ राजपूत, ज्ञानेश्वर सोनार, चंद्रकांत सोनवणे, ईस्माईल फकीरा शेख, प्रवीण पाटील, अफसर काकर, विशाल पाटील, विसपुते अण्णा यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रशासकीय पातळीवर नायब तहसीलदार प्रमोद मोरे, सौ. सुषमा उरकुडे, महादेव फड, प्रतिभा लोहार, तसेच ग्राम महसूल अधिकारी निखिल बळी, रितेश गोसावी, योगेश व्यास, अमोल शिंदे व इतर कर्मचारी, पोलीस पाटील आणि रेशन दुकानदार यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
नागरिकांची प्रतिक्रिया: “शासकीय कार्यालयात चकरा मारण्याऐवजी प्रशासन स्वतः आमच्या गावात आल्याने आमचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटले आहेत,” अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.





