लोहारीचा सुपुत्र पश्चिम बंगालमध्ये शहीद; जवान बापू कोळी यांना उद्या शासकीय इतमामात दिला जाणार अंतिम निरोप

पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील रहिवासी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात (CISF) कार्यरत असलेले जवान बापू उखा कोळी (वय ४४) यांना पश्चिम बंगालमध्ये निवडणूक कर्तव्यावर असताना वीरमरण आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण लोहारी गावावर आणि पाचोरा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शहीद बापू कोळी यांचे पार्थिव उद्या, ३० मार्च रोजी त्यांच्या मूळ गावी आणले जाणार असून सकाळी १० वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बापू कोळी हे सध्या नाशिक येथील करन्सी नोट प्रेस (CNP) मध्ये ‘हेड कॉन्स्टेबल’ म्हणून कार्यरत होते. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी त्यांची तुकडी जलपायगुडी येथे तैनात करण्यात आली होती. २७ मार्च २०२५ रोजी कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाले. त्यांनी भारतीय सैन्यात (CISF) २ ऑगस्ट २००२ रोजी प्रवेश केला होता. गेल्या २४ वर्षांपासून ते देशसेवेसाठी समर्पित होते. बापू कोळी यांचे कुटुंब अत्यंत गरीब असून त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर आणि अफाट संघर्षातून सैन्यदलात नोकरी मिळवली होती. त्यांच्या निधनाने कुटुंबाचा मोठा आधार हिरावला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. शहीद बापू कोळी यांच्या निधनाची बातमी लोहारी परिसरात समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव आज पश्चिम बंगालमधून विमानाने महाराष्ट्रात रवाना झाले असून, ते रात्री उशिरापर्यंत त्यांच्या निवासस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे. सोमवार दि. ३० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता लोहारी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. या नियोजनासाठी लोहारी ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ, जगदंबा मित्र मंडळ आणि गावातील तरुण मंडळी परिश्रम घेत आहेत. या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.




