स्मार्ट वीज मीटर बदलण्याच्या नावाखाली लाच मागणीला बळी पडू नका! लाच लुचपत विभागाचे नागरिकांना अवाहन

मधुर खान्देश वृत्तसेवा | जळगांव: महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलून त्याजागी नवीन स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम एन.सी.सी. या एजन्सीमार्फत विनामूल्य सुरू आहे. नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जुने मीटर महावितरण कार्यालयात जमा केले जातात. जर जुन्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसेल, तर त्याची कोणतीही टेस्टिंग केली जात नाही किंवा कोणताही आर्थिक दंड आकारला जात नाही. मात्र, काही महावितरण कर्मचारी ग्राहकांना “तुमचे मीटर फॉल्टी आहे, सील तुटलेले आहे, टेस्टिंगसाठी पाठवावे लागेल, दंड भरावा लागेल किंवा वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल” असे खोटे सांगून मोठ्या प्रमाणात लाच मागत असल्याचे तपासात व नागरिकांच्या तक्रारींद्वारे समोर आले आहे.
महावितरणने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे लाचेची मागणी झाल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव येथे खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव: ०२५७-२२३५४७७
- टोल फ्री क्रमांक: १०६४
- श्री. योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., जळगांव: ९७०२४३३१३१
नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशा फसव्या प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.