चक्रीवादळसदृश पावसाने महावितरणचे मोठे नुकसान; पाचोरा तालुक्यात वीजपुरवठा खंडित, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू;

- काम सुरू असताना अनेक ग्राहकांकडून सतत फोन येत आहेत, ज्यामुळे आमच्या कामात अडथळे येत आहेत… महावितरण कॉल करणे टाळून सहकार्य करा.
पाचोरा १२ जून २०२५: जळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळसदृश पावसाने पाचोरा तालुक्यात महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे पाचोरा शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजेच्या तारा तुटणे आणि पोल पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी यामुळे स्थानिक नागरिकांना वीजपुरवठा खंडित असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यामध्ये महावितरणच्या अधिकारी सहाय्यक अभियंता मनोज मोरे यांनी सांगितले की, “सध्या महावितरण कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत. लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल.” तथापि, अनेक ठिकाणी पोल आणि तारांचे नुकसान झाल्याने दुरुस्तीच्या कामात अडचणी येत आहेत.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. “काम सुरू असताना अनेक ग्राहकांकडून सतत फोन येत आहेत, ज्यामुळे आमच्या कामात अडथळे येत आहेत. आम्ही ग्राहकांना विनंती करतो की, फोन कॉल टाळावेत. आम्ही शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा पूर्ववत करू,” असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच, ग्राहकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
सध्या पाचोरा तालुक्यातील अनेक भागात अंधार पसरला असून, नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरण प्रशासनाने लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आश्वासन दिले आहे.



