पाचोरा पत्रकारांच्या पुढाकाराने जनतेच्या समस्या ऐकल्या; आ. किशोरआप्पा पाटील यांच्या आदेशाने उद्या सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक

पाचोरा प्रतिनिधी — पाचोरा शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्वाचा आणि दैनंदिन गरजांशी निगडित असलेला विषय म्हणजे एटीएम सेवा आणि बँक व्यवहारांतील सातत्याने निर्माण होणाऱ्या अडचणी. या गंभीर समस्येकडे शासन, प्रशासन आणि बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी पाचोरा शहरातील पत्रकारांनी पुढाकार घेतला असून, दिनांक 29 मे रोजी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्यासह स्थानिक आमदार किशोरआप्पा पाटील यांचे प्रतिनिधी व जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाची दखल घेत, आमदार किशोरआप्पा पाटील यांनी तत्काळ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने कृती सुरू केली आहे. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात उद्या दिनांक 30 मे रोजी पाचोरा शहरातील सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत बँक व्यवस्थापक यांच्यात थेट संवाद साधून समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता, पाचोरा शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील लोक सतत अडचणीत सापडले आहेत. विशेषतः राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे एटीएम केंद्रे वारंवार बंद असल्याने, नागरिकांना आवश्यक त्या वेळी रोख रक्कम मिळण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. काही ठिकाणी ‘नेटवर्क समस्या’, ‘ कॅश उपलब्ध नाही’, ‘देखभाल सुरू आहे’ अशा सूचना लावून सेवा बंद ठेवली जाते. तर काही ठिकाणी यंत्रणेच पूर्णपणे बंद असून, ग्राहकांना केवळ निराशाच पदरी पडते. या समस्येचा सर्वाधिक फटका सध्या शेतकरी वर्गाला बसत आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी रोख रक्कमेची निकड असते. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक कर्जाच्या स्वरूपात रक्कम जमा झालेली आहे. परंतु, एटीएम सेवा बंद असल्यामुळे किंवा बँकांमध्ये होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणीमुळे त्यांना आपलीच रक्कम वेळेवर मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत होत असून, त्यांच्यावर आर्थिक व मानसिक तणाव वाढला आहे. म्हणून पाचोरा येथील पत्रकारांनी सादर केलेल्या निवेदनात नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. निवेदनात पुढीलप्रमाणे स्पष्ट व ठोस मागण्या मांडण्यात आल्या आहेत 1. पाचोरा शहर व तालुक्यातील सर्व एटीएम केंद्रांची तातडीने तपासणी करावी.& सध्या किती एटीएम कार्यरत आहेत, किती बंद आहेत, याचा संपूर्ण डेटा संकलित करावा.2) जे एटीएम वारंवार किंवा सतत बंद राहत आहेत, त्यांना कार्यान्वित करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी.
3) प्रत्येक बँकेने किमान एक एटीएम केंद्र २४ तास कार्यरत ठेवावे.विशेषतः शेतकरी व विद्यार्थी वर्गासाठी ही सेवा अत्यावश्यक आहे. 4) प्रत्येक एटीएम कॅबिनमध्ये, मशीन बंद किंवा नादुरुस्त असल्यास त्वरित संपर्क साधता यावा यासाठी सूचना फलक लावावा. यामध्ये संबंधित बँकेच्या किमान चार अधिकाऱ्यांची नावे व ( कार्यान्वीत ) मोबाइल क्रमांक नमूद असावेत.5.) बँकेच्या सेवा संदर्भात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी नागरीकां कडून लेखी स्वरूपात संकलित करून त्यावर संयुक्त बैठक घ्यावी. 6) बँक व्यवहारासाठी हिंदी व मराठीत मितभाषी अधिकारी/कर्मचारी नियुक्त करावेत.
या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, वरील सर्व मागण्या 5 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात. अन्यथा, जनहितार्थ सामाजिक बांधिलकीतून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.
यामध्ये सतत बंद राहणाऱ्या एटीएम केंद्रांना ढोल-ताशांच्या गजरात पुष्पहार अर्पण करून लोकशाही पद्धतीने ‘अंत्यसंस्कार’ करण्यात येतील. विशेषतः रेल्वे स्टेशनबाहेर असलेले सतत बंद राहणारे एटीएम केंद्र हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे.
यानंतर संबंधित बँक व्यवस्थापकांना गुलाबपुष्प व पेन अर्पण करून त्यांच्या सजगतेसाठी ‘नम्रतेने जागृती’ करण्यात येईल. शेवटी, जर बँक व्यवस्थापनाने सकारात्मक कार्यवाही केली नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता बँकेसमोर ‘ढोल बजाओ आंदोलन’ राबवण्यात येईल.
हा लढा केवळ सामाजिक बांधिलकीतून… राजकारणाशी काहीही संबंध नाही!
या संपूर्ण चळवळीचा मूळ हेतू म्हणजे जनतेच्या मुलभूत गरजांकडे लक्ष वेधून त्या सोडविणे. या आंदोलनाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी वा प्रवृत्तीसोबत संबंध नसून, पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीतून आणि जनहिताच्या भूमिकेतून पुढाकार घेतल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत खालील अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, जेणेकरून संबंधित यंत्रणाही या गंभीर समस्येकडे लक्ष देतील व समन्वयाने काम करतील 1)मा. डीवायएसपी साहेब, पाचोरा, जि. जळगाव 2) मा. तहसीलदार साहेब, पाचोरा, जि. जळगाव 3) मा. पोलिस निरीक्षक साहेब, पाचोरा, जि. जळगाव 4) मा. रेल्वे स्टेशन अधीक्षक साहेब, पाचोरा, जि. जळगाव
या संपूर्ण घडामोडीत आमदार किशोरआप्पा पाटील यांची तात्काळ प्रतिक्रिया आणि कार्यवाही उल्लेखनीय ठरली आहे. निवेदन प्राप्त होताच त्यांनी काही सेकंदात याची गंभीर दखल घेत, लगेचच उद्याच सर्व बँक व्यवस्थापकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व अडचणींचा सखोल आढावा घेऊन, नागरिक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्वरित सोडवणूक करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या प्रकारे पत्रकारांनी केलेल्या संयमी व लोकशाही माध्यमातून सुरू झालेल्या चळवळीला प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून मिळालेला प्रतिसाद निश्चितच आदर्शवत आहे. ही बैठक व त्यानंतर होणारी कार्यवाही पाचोरा शहर व तालुक्याच्या बँकिंग प्रणालीत सकारात्मक बदल घडवून आणेल, अशी सर्वसामान्यांची आशा आहे.