गोराडखेडा येथे चक्रीवादळसदृश पावसाचा फटका; घरांची पडझड, फळबागांचे नुकसान, बैलाचा मृत्यू

मधुर खान्देश वृत्तसेवा| पाचोरा, १२ जून २०२५: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा गावात काल, ११ जून २०२५ रोजी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोराडखेडा बुद्रुक आणि खुर्द परिसरात घरांची पडझड होऊन वारा वादळ मध्ये पत्रे उडून फळबागांचे नुकसान तसेच एका शेतकऱ्याच्या बैलाचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोराडखेडा बुद्रुक येथील शेतकरी ईश्वर राघो पाटील यांच्या शेतात (गट क्र. १४८/२) वीज पडल्याने त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, गावातील अनेक घरांचे पत्रे उडाले असून, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि गावकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीची पाहणी आणि पंचनामा करण्यासाठी गोराडखेडा तलाठी मयुरी पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी नंदकिशोर पंचलींगे, गोराडखेडा तलाठी कार्यालयाचे कोतवाल ईश्वर पाटील, गोराडखेडा खुर्द सरपंच मनोज (आप्पा) उत्तमराव पाटील आणि गोराडखेडा बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मराठे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनाम्याचे करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी आणि गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे पूर्ण करून आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे. “वादळामुळे आमच्या घरांचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने लवकर मदत करावी,” अशी मागणी ईश्वर राघो पाटील यांनी व्यक्त केली. याठिकाणी तलाठी मयुरी पाटील आणि पशुवैद्यकीय अधिकारी नंदकिशोर पंचलींगे यांनी नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक प्रशासनाने शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना लवकरच शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. गोराडखेडा खुर्द सरपंच मनोज पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मराठे यांनीही गावकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे कबूल केले आहे.
या नैसर्गिक संकटामुळे गोराडखेडा गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने त्वरित पावले उचलून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.