जळगाव : बिअरबारात तोडफोड आणि हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘आधी पैसे, मगचं मद्य’ प्रणालीचा प्रस्ताव? लवकरच अंमलबजावणी होणार असल्याची माहिती

जळगाव, दि. २४ जून २०२५ : जळगाव-भुसावळ महामार्गावरील हॉटेल वरुण येथे दिनांक २३ जून २०२५ रोजी रात्री १५ ते २० अज्ञात व्यक्तींनी बिलाच्या वादावरून हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांवर चाकू आणि बाटल्यांनी हल्ला केला. या घटनेने जिल्ह्यातील मद्यविक्री व्यवसायातील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ उपलब्धता काउंटरवरील काम करणारे गरीब घरातील होतकरू तरुण तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करून जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशनने निषेध व्यक्त करत ‘आधी पैसे द्या, मगचं मद्य घ्या’ या सेल्फ काऊंटर सिस्टीमची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
हॉटेल वरुणमधील हल्ल्याचा प्रकार
काल रात्री हॉटेल वरुण येथे बिलाच्या वादातून अज्ञात ग्राहकांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली. यावेळी कर्मचाऱ्यांना चाकूने जखमी करण्यात आले तसेच बाटल्या फोडून हल्ला करण्यात आला. या घटनेने स्थानिक व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनाची उदासीनता
जळगाव जिल्ह्यात अशा घटना गेल्या काही वर्षांपासून वारंवार घडत आहेत. मद्यविक्री व्यवसायात गुन्हेगारी वाढत असताना प्रशासनाकडून पुरेशी साथ मिळत नसल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परिणामी, गुन्हेगारांना आळा घालणे कठीण झाले आहे. यामुळे व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
आधी पैसे, मगचं मद्य’ प्रणालीचा प्रस्ताव
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील काही परमिट रूम आणि बिअर बार चालकांनी ‘सेल्फ काऊंटर सिस्टीम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीनुसार, ग्राहकांना आधी पैसे द्यावे लागतील आणि त्यानंतरच मद्य दिले जाईल. यामुळे बिलाच्या वादातून होणाऱ्या भांडणांना आणि हिंसाचाराला आळा बसण्याची शक्यता आहे. तसेच, प्रत्येक हॉटेलमध्ये अँडव्हान्स टोकन प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू आहे.
उद्या बिअरबार बंदचा निर्णय
या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशनने उद्या (दि. २५ जून २०२५) जिल्ह्यातील सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, व्यापाऱ्यांनी नव्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे
“गेल्या काही वर्षांपासून आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाची साथ नसल्याने गुन्हेगारांचा धाक वाढला आहे. आता आम्ही स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि व्यवसायाच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलणार आहोत,” असे असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
पुढील दिशा
प्रस्तावित सेल्फ काऊंटर सिस्टीम आणि टोकन प्रणाली लवकरच जिल्हाभरात लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे मद्यविक्री व्यवसायातील असुरक्षितता कमी होईल, अशी आशा व्यापारी वर्गाला आहे. प्रशासन या निर्णयाला कसा प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.