आंतरराष्ट्रीय स्तरावर माळी समाजाचा झेंडा फडकवला;नेपाळमधील कुशवाह-माळी समाजाला मुंबई-महाराष्ट्रात मदतीचा हात देणार

काठमांडू (विशेष प्रतिनिधी):
नेपाळ येथे ‘नेपाळ कुशवाह कल्याण समाज’ या संघटनेच्या वतीने आयोजित भव्य लव-कुश जयंती सोहळ्यात माळी समाजाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा आत्मविश्वासाने फडकला. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रातील माळी समाजाचे खंबीर प्रतिनिधित्व करणारे ‘माळी महासंघा’चे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांचा नेपाळमधील कुशवाह-माळी समाजाच्या वतीने अत्यंत आदराने सत्कार व गौरव करण्यात येणार होता. मात्र, नेपाळमधील सद्यःस्थितीतील भयावह पूर परिस्थिती पाहता, सामाजिक संवेदनशीलतेचा नवा आदर्श घालून देत अनिल महाजन यांनी स्वतःचा सत्कार स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रसंगी व्यासपीठावर नेपाळ कुशवाह कल्याण समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील माळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या प्रखर भाषणात अनिल महाजन यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, “नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरात अनेक स्थानिक समाजबांधवांचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा अत्यंत दुःखद प्रसंगी कोणताही उत्सव साजरा करणे किंवा सत्कार स्वीकारणे मनाला पटत नाही. नेपाळ सरकारने पूरग्रस्तांना त्वरित व पूर्ण पुनर्वसन मदत दिली पाहिजे. त्याचप्रमाणे, या नैसर्गिक आपत्तीत नेपाळमध्ये अडकलेले जे भारतीय पर्यटक आहेत, त्यांना नेपाळ कुशवाह समाजाने सर्वतोपरी मदत व सुरक्षित आधार द्यावा.” तसेच नेपाळमधील या बांधवांना मुंबई व महाराष्ट्रात कधीही गरज भासल्यास सर्वतोपरी मदतीचा हात दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
माळी समाजाच्या जागतिक संघटनाविरोधी वाटचालीवर मार्गदर्शन करताना महाजन यांनी समाजातील विविधतेतील एकतेवर प्रकाश टाकला. “हा समाज भारत आणि भारताबाहेर वेगवेगळ्या प्रदेशांत विविध नावांनी विखुरलेला आहे. नेपाळ, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये हा समाज ‘कुशवाह’, राजस्थानमध्ये ‘सैनी’ व ‘गेहलोत’, उत्तर प्रदेशात काही ठिकाणी ‘मौर्य’, तर महाराष्ट्रात ‘माळी’ व ‘महाजन’ अशा आडनावांनी ओळखला जातो. नावे व प्रांतीय ओळख वेगवेगळी असली, तरी आपली मूळ संस्कृती आणि नाळ एकच आहे,” असे सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर माळी समाजाचे मजबूत संघटन उभारण्याचे आवाहन केले. नेपाळ आणि महाराष्ट्रातील माळी-कुशवाह समाजाला एका धाग्यात बांधणारा हा सोहळा अनिल महाजन यांच्या सामाजिक भान, तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.




