नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
ताज्या बातम्याराजकारण

पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघांचा भाजप प्रवेश निश्चित;मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रवेश….८ मे २०२४ च्या देवेंद्र फडणवीस अन् दिलीप वाघांचा भेटीची सर्वत्र चर्चा….


Advertisements
Ad 4

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे प्रवेशाचे मुहूर्त निश्चित झाले माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होताच मतदार संघातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काहींनी हा निर्णय राजकीय गरज म्हणून पाहिला, तर काहींनी त्यांच्या मूळ विचारधारेपासून झालेला बदल मानला. काही राजकीय निरीक्षकांनी याला स्वार्थ म्हणून हिणवले, तर काही समर्थकांनी याला राजकीय वास्तवाशी जुळवून घेण्याची गरज असल्याचे मान्य केले. परंतु, या निर्णयामागील वस्तुस्थिती, राजकीय समीकरणे आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात घेतल्यास, तो केवळ एक राजकीय तडजोड नसून पुढील राजकीय प्रवास सुसह्य करण्यासाठीचा रणनीतिक विचार असल्याचे स्पष्ट होते. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशावरून अनेकांनी आपापल्या परीने विश्लेषण सुरू केले. काहींना आश्चर्य वाटले की, एका समाजवादी कुटुंबातून आलेले आणि कधीही हिंदुत्ववादी विचारसरणीशी संबंध नसलेले दिलीपभाऊ भाजपमध्ये कसे सामील होऊ शकतात? काहींनी त्याचा अर्थ स्वार्थी राजकारण आणि सत्तेची आस याशी लावला.मात्र, राजकारण हा केवळ विचारधारांचा खेळ नसून, तो वास्तवावर आधारलेला असतो. एखाद्या नेत्याच्या भूमिका, त्याच्या वाटचालीतील संघर्ष, त्याला मिळालेला पाठिंबा किंवा झालेली उपेक्षा, याचा बारकाईने विचार केला तर या निर्णयामागील कारणे सहज उलगडतात.माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचे वडील, स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ, हे महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात गरीब, मध्यमवर्गीय व्यापारी आणि शेतकरी समाजाच्या हितासाठी लढा दिला. त्यांनी निवडणुका लढवल्या, आमदारकी भूषवली आणि त्यांच्या राजकीय कार्यकाळात अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. विशेष म्हणजे, स्व. आप्पासाहेब वाघ हे 1995 मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे पहिले सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अपक्ष आमदारांपैकी एक होते. त्यांच्या आणि इतर अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळेच हे सरकार सत्तेत आले आणि सुरेशदादा जैन यांना मंत्रिपद मिळाले. त्यामुळे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपशी संबंध नव्याने सुरू झालेला नाही, तर तो अप्रत्यक्षरीत्या पूर्वीपासून होता.आजचे राजकारण 90च्या दशकाच्या किंवा 2000 च्या दशकाच्या सुरुवातीसारखे राहिलेले नाही. आजच्या घडीला विचारधारेपेक्षा पक्षाचे पाठबळ, आर्थिक बळ आणि सत्ता समीकरणे अधिक महत्त्वाची ठरतात. एकेकाळी विचार आणि तत्वांसाठी झटणारे कार्यकर्ते आजच्या राजकीय वातावरणात पैशाच्या बाजारात हरवत चालले आहेत. आजच्या निवडणुकीच्या राजकारणात, उमेदवाराच्या लोकप्रियतेपेक्षा पक्षाच्या आर्थिक पाठबळाचा प्रभाव जास्त दिसून येतो. निवडणुकीच्या काळात घरच्या भाकरी बांधून प्रचार करणारे कार्यकर्ते आता कुठे दिसत नाहीत, आणि त्यांची जागा पैसे देऊन विकत घेतलेले समर्थक घेत आहेत. त्यामुळे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांसारख्या नेत्यांनी सत्तेच्या समीकरणानुसार निर्णय घेणे अपरिहार्य ठरते. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाच्या आणि नेत्यांच्या विश्वासावर काम केले. मात्र, प्रत्येकवेळी त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले नाही. पक्षाकडूनही आणि काही ठिकाणी मतदारांकडूनही अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे, निवडणूक लढवण्यासाठी स्वतः खिशातून खर्च करावे लागतात, हे कुणालाही दीर्घकाल टिकवता येणार नाही.
अशा परिस्थितीत, “समय के साथ चलो” या तत्त्वाचा स्वीकार करणे अपरिहार्य ठरते. पक्ष आणि विचारधारेशी बांधील राहण्याचा आग्रह धरत बसल्यास, राजकीय अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय केवळ तडजोड नसून, भविष्याचा विचार करून घेतलेला निर्णय असू शकतो.  भाजप सारख्या पक्षांमध्ये वाघ यांचा समावेश झाल्यास भाजप सरकारमध्ये स्थानिक विकासाच्या संधी अधिक असून कदाचित याचा लाभ मतदारसंघासाठी  होऊ शकतो. नव्या पिढीच्या बदलत्या राजकीय वातावरणात नव्या पिढीच्या राजकारणाशी जुळवून घेणे आवश्यक असते.
स्व. आप्पासाहेब वाघ यांचा अप्रत्यक्ष वारसा :– 1995 च्या सरकार स्थापनेत त्यांनी थेट प्रत्यक्षपणे मदत केली होती. किंबहुना यांचे थोडक्यात मंत्रीपद देखील हुसकले होते हे विसरून चालणार नाही त्यामुळे भाजपसोबत जाणे पूर्णतः अनपेक्षित नाही.
कोणत्याही पक्षाचा नेता असो, सत्ताधारी पक्षाच्या जवळ राहिल्यास मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळवणे सोपे होते.
दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशावर विरोधकांनी टीका करणे स्वाभाविक आहे. मात्र, राजकारणात कोणताही निर्णय घेतल्यावर समर्थन आणि विरोध असणारच. त्यांचे समर्थक त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहतील, तर विरोधक त्याला संधी म्हणून पाहतील.
भाजप प्रवेशामुळे, त्यांच्या मतदारसंघात नवे समीकरण तयार होईल. काही पारंपरिक कार्यकर्ते नाराज होऊ शकतात, तर नवीन कार्यकर्ते जोडले जातील. परंतु, एक गोष्ट निश्चित आहे की, हा निर्णय भविष्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा ठरेल.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश हा केवळ राजकीय स्वार्थ किंवा विचारधारेला तिलांजली देण्याचा निर्णय नाही, तर तो परिस्थितीनुसार घेतलेला राजकीय निर्णय असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी, राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि भविष्यातील संधींसाठी हा निर्णय योग्य ठरू शकतो. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याऐवजी, हा बदल व्यापक दृष्टीकोनातून पाहायला हवा. “राजकारण हे स्थित्यंतरशील असते आणि त्यात टिकून राहायचे असेल, तर काळानुसार बदल स्वीकारावेच लागतात.”पाचोरा भडगाव राजकारणाची विशेष बाब म्हणजे या ठिकाणी विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांचे एकतर्फे वर्चस्व आहे आणि शिंदे शिवसेना व भाजप यांचे मनोमिलन हे फक्त सत्तेवर बसण्यासाठी निवडणुकीनंतर एकत्र झालेले नाही तर एकत्रित निवडणूक लढवून एकतर्फी बहुमत प्राप्त केलेले आहे अशा त्रिसूत्री सरकार मधील पक्ष हे मित्र पक्ष समजले जातात आणि स्थानिक पातळीवर विरोधाला विरोध म्हणून राजकारण करणे शक्य नाही म्हणून विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याशी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार केव्हा हात मिळवणी करायची कुठे थांबायचे आणि कुठे लढायचे याचे परिपूर्ण गणित दिलीपभाऊ वाघ यांना असल्यामुळे निश्चितच मित्र पक्षाशी वाद उफाळून न येता मैत्रीपूर्ण वातावरणात निवडणुका होतील असे आज तरी निश्चित दिसत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button