समता सैनिक दल मजबूत करणे ही काळाची गरज; पाचोऱ्यात भव्य बाईक रॅलीने वेधले लक्ष

पाचोरा (प्रतिनिधी):”समता सैनिक दल ही एक ध्येयवादी संघटना असून, ‘गाव तिथे शाखा – घर तिथे सैनिक’ या ब्रीदवाक्याप्रमाणे ती प्रत्येक घराघरात पोहोचली पाहिजे. देशात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही मूल्ये रुजवण्यासाठी समता सैनिक दल मजबूत करणे ही आजच्या काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी केले.
समता सैनिक दलाच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त १३ मार्च २०२६ रोजी पाचोरा शहरात भव्य बाईक व पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दरवर्षाप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. रॅलीची सुरुवात जारगाव चौफुली येथून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून झाली. मुख्य मार्गावरून निघालेली ही रॅली रेल्वे स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ विसर्जित झाली. रॅलीत केवळ शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुण आणि महिला मोठ्या संख्येने स्वयंप्रेरणेने सहभागी झाल्या होत्या. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पार पडली. पाचोरा शहर पोलीस व वाहतूक शाखेने चोख बंदोबस्त ठेवला होता. रॅलीच्या समारोपप्रसंगी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याने उपस्थितांमध्ये नवा उत्साह भरला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यकारिणी, तालुका आणि शहर कार्यकारिणीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे यांनी सर्वांचे आभार मानले.





