पाचोरा तालुक्यातील बेपत्ता तरुणाचा प्रेमसंबंधातून खून; पती-पत्नीला अटक, पोलीस कोठडीत वाढ!

पाचोरा : तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय तरुण विजय भिमा राठोड याच्या बेपत्ता प्रकरणाचा पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी छडा लावला असून, धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. प्रेमसंबंधाच्या वादातून विजयचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकी घटना काय?
वरसाडे तांडा येथील विजय राठोड हा २५ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री अचानक घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. त्याचा भाऊ संजय राठोड याने २६ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार (मिसिंग रजि. नं. १५/२०२६) दाखल केली होती. सदर बेपत्ता तरुणाचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती गोळा केली. या आधारे संशयाची सुई संजय परशुराम जाधव याच्याकडे वळली. सुरुवातीला आरोपी संजय उडवाउडवीची उत्तरे देत होता, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.
खुनाचे कारण: अश्लील व्हिडिओ आणि धमकावणे
आरोपी संजय जाधव याच्या माहितीनुसार, त्याची पत्नी सोनाली हिचे मयत विजय राठोड याच्याशी प्रेमसंबंध होते. या संबंधातून विजयने सोनालीचे काही अश्लील व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते आणि तो तिला सतत धमकावत होता. ही बाब संजयला समजल्यानंतर त्याने संतापून आपल्या पत्नीच्या मदतीने विजयचा काटा काढण्याचे ठरवले. दोघांनी मिळून विजयची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेताची विल्हेवाट लावली.
पोलीस कोठडीत वाढ
या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करून पाचोरा न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. दिनाक १७ मार्च रोजी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी आणि महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी सपोनि कल्याणी वर्मा यांनी कोठडीची मागणी केली, सदर मागणी न्यायालयाने मान्य करत आरोपींना पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (पवार), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपासात सपोनि कल्याणी वर्मा यांच्यासह पोउपनि विठ्ठल पवार, किरण ब्राह्मणे, अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहरे, पांडुरंग गोरबंजार, अमोल पाटील, नामदेव इंगळे, भारत पाटील, दीपक अहिरे आणि सागर पाटील,प्रमोद पोलिस यांनी मोलाची भूमिका बजावली.




