पाचोरा:भिषण आगीत शेतकऱ्याचे सहा लाखांचे नुकसान होऊनही प्रशासन घटनांसाठी पोहचले नाही! शेतकऱ्यांमध्ये संताप

“शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सोबत आहोत” असे म्हणणारे लोकप्रतिनिधी गायब?”
पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथे २५ एप्रिल रोजी सायंकाळी भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. स्थानिक शेतकरी राजेंद्र कौतिक पाटील व लक्ष्मण सुरेश चांगरे यांच्या लोहारी बुद्रुकच्या शेतात ही आग लागली असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीमध्ये झाडे, कापून ठेवलेला मका, ठिबक सिंचनच्या नळ्या आणि इतर शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत शेतकऱ्यांचे जवळपास सहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, ऐन काढणीच्या हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप कोणत्याही जबाबदार अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन सांत्वन केलेले नाही. शेतकऱ्यांनी तलाठी गोसावी यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता, ‘निवडणुकीची ड्युटी आहे’ असे कारण सांगून त्यांनी येण्यास टाळाटाळ केली. तसेच महावितरणचे वायरमनदेखील अद्याप पोहोचलेले नाहीत. “शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सोबत आहोत” असे म्हणणारे लोकप्रतिनिधी गप्प का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून, वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन तातडीने पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




