ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेणार नाही;जूनमध्ये मुंबईतून एल्गार, ‘ओबीसी जनक्रांती परिषदेचे अनिल महाजन यांची घोषणा
मुंबई:“महाराष्ट्र सरकार सध्या विशिष्ट समाजाला कडे-खांद्यावर घेऊन फिरत असून वर्षानुवर्षांपासून ओबीसी समाजाच्या मागण्या रखडल्या आहेत. राज्य सरकार संपूर्ण ओबीसी समाजाला गृहीत धरण्याचे काम करत आहे. मात्र, आता ओबीसी समाज गप्प बसणार नाही,” असा इशारा ओबीसी जनक्रांती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. अनिलभाऊ महाजन यांनी दिला आहे. त्यांनी आज अधिकृत फेसबुक पेजवरून लाईव्ह येत ओबीसी बांधवांना पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
व्हिडिओ:https://www.facebook.com/anil.mahajan.854348/videos/2069178990642250/?rdid=DZbXhtIsTkQFR6Mn#
‘जातीसाठी माती खा’; ओबीसी आमदारांना, मंत्र्यांना थेट आव्हान
अनिलभाऊ महाजन यांनी सरकारमधील ओबीसी लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “इतर समाजाचे मंत्री, आमदार, खासदार आपल्या जातीच्या मागण्यांसाठी आक्रमक होतात, मग ओबीसींचे लोकप्रतिनिधी का गप्प बसतात? राज्य सरकारमधील ओबीसी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी आता सरकारमधून बाहेर पडावे आणि ओबीसी समाजाच्या हक्कासाठी ‘जातीसाठी माती खावी’. ओबीसींवर अन्याय करणारे शासनाचे खोटे आणि बोगस निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावे.”
यावेळी त्यांनी प्रसादजी लाड आणि राधाकृष्णजी विखे-पाटील यांचे उदाहरण देत, जर इतर समाजाचे नेते आपल्या जातीसाठी ठाम उभे राहू शकतात, तर आपले ओबीसी नेते समाजाला गृहीत का धरत आहेत, असा सवाल केला.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘कट्टर जातीवाद’
शासकीय सेवेतील ओबीसी कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना महाजन यांनी गंभीर आरोप केले. राज्यभरातील ओबीसी वर्गातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना बदली आणि पदोन्नती (प्रमोशन) मध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. “काही जातीवादी मंत्री आणि नेत्यांच्या दबावापोटी विशिष्ट समाजातील अधिकाऱ्यांना मर्जीतील ‘क्रिम पोस्टिंग’ दिल्या जात आहेत. शासकीय अधिकाऱ्यांना जात नसते, मात्र पदोन्नतीच्या वेळी सरकारकडून कट्टर जातीवाद केला जातो. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जातीच्या आधारे साईड पोस्टिंग देणे पूर्णपणे चुकीचे आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
‘ओबीसी जनक्रांती परिषद’ आगामी आंदोलनाची दिशा:
ओबीसी समाजावरील अन्यायाविरोधात परिषदेने पुढील आंदोलनाचे टप्पे जाहीर केले आहेत:
- प्रमुख नेत्यांची बैठक: जून २०२६ मध्ये मुंबई येथे राज्यस्तरीय ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल.
- राजकीय कार्यालयाबाहेर ढोल बजाओ आंदोलन: सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख कार्यालयाबाहेर आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशन समोर ढोल वाजवून राजकीय नेत्यांना जागे केले जाईल.
- ओबीसी मंत्र्यांना घेराव: सरकारमध्ये सामील असलेले ओबीसी नेते श्रीमती पंकजाताई मुंडे, श्री. अतुलजी सावे, श्री. जयकुमारजी गोरे, श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, श्री. गिरीशजी महाजन, श्री. छगनजी भुजबळ व इतर आमदारांना भेटून “ओबीसींसाठी सरकारमधून बाहेर पडा” असे सांगण्यासाठी परिषदेचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेईल.
- महाराष्ट्रभर आंदोलन: या आंदोलनाची सुरुवात मुंबईमधून होईल आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर तीव्र निदर्शने केली जातील.
“कायदा हातात न घेता लढणार”
“कोणाला शिव्या देणे, दगड-धोंडे हातात घेणे किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवणे हे आमचे काम नाही. आम्ही फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत. शांततेच्या मार्गाने पण आक्रमकपणे आम्ही आमचा हक्क मिळवू आणि ओबीसींच्या आरक्षणात कोणाचीही घुसखोरी सहन करणार नाही,” असा संदेश अनिलभाऊ महाजन यांनी शेवटी ‘ऊठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो’ अशी हाक देत दिला.





