पाचोरा तालुक्यात 36 तासांपासून वीजपुरवठा ठप्प; ग्रामीण जनजीवन विस्कळीत

पाचोरा: पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे, वेरुळी खु., वेरुळी बुद्रुक, पहाण हडसन, मोहाडी, बिलदी, साजगाव आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या 36 तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन ठप्प झाले असून, नागरिकांना पाण्याअभावी विहिरीतून दोर-बादलीने पाणी काढण्याची वेळ आली आहे.
अचानक आलेल्या चक्रीवादळसदृश पावसामुळे महावितरणच्या वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत महावितरणचे अधिकारी प्रमोद हेलोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, “रात्री वीजपुरवठा सुरू झाला होता, परंतु ब्रेकरचा पोल तुटल्याने खंड पडला. दुसऱ्या मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे. लवकरच सेवा पूर्ववत होईल.” मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे दुरुस्तीला विलंब होत असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागात रखडले मेंटेनन्स
ग्रामीण भागातील वीज ग्राहकांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. “शहरी भागात वेळोवेळी मेंटेनन्स केले जाते, पण ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होते. वेळेवर देखभाल आणि पुरेसे मनुष्यबळ असते, तर ही वेळ आली नसती,” अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या. अनेक वर्षांनंतर विहिरीतून पाणी काढण्याची वेळ आल्याने ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत.
महावितरणसमोर आव्हाने
चक्रीवादळसदृश पावसाने वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, मनुष्यबळ कमी असल्याने कामाला वेळ लागत आहे. ग्रामीण भागातील वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून वेळेवर देखभाल आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.