पाचोरा तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला; साजगाव येथील महिलेचा उष्माघाताने मृत्यू ?

दि.१७ एप्रिल २०२६ | जळगाव: राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साजगाव येथील सुनिता तुकाराम गायकवाड (वय अंदाजे ४५-५०) या आपल्या स्वतःच्या शेतात मका कापणीचे काम करत होत्या. दुपारच्या सुमारास कडक उन्हात काम करत असताना त्यांना अचानक मळमळ होऊन उलट्यांचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुनिता गायकवाड यांच्या मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे. सध्या तालुक्यात तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतात राबणाऱ्या कष्टकरी महिलेचा मृत्यू झाल्याने साजगाव, बिलदि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असून आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाकडून देण्यात आल्या आहेत. सदर घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





